Friday, January 1, 2021

सावित्रीबाई फुले - स्त्री शिक्षणाच्या जनक



जगाच्या इतिहासात न मिळणारे स्त्री व्यक्तिमत्व, समाज व्यवस्थेच्या विरुद्ध प्रवाहाने शैक्षणिक कार्य करून जगाच्या इतिहासात स्त्रियांना स्थान मिळवून देणारी थोर माता, स्त्री शिक्षणाच्या प्रथम प्रणेत्या, स्त्री शिक्षणाच्या जनक,भारतातील पहिल्या शिक्षक,मुख्याध्यापिका,महिला समाजसुधारक, मराठीतील पहिल्या कवयित्री, पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत म्हणजेच विश्वभुषण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.

          अज्ञान आणि अंधकाराने ग्रासलेल्या समाजात एक मशाल बनून  3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी जन्म घेते. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी 1840 साली झाले. त्यावेळी ज्योतिबा तेरा वर्षांचे होते.

           लहानपणी सावित्रीबाई शिरवळच्या  बाजारात जिलेबी खात उभ्या होत्या,तेव्हा कोणीतरी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना ख्रिश्चन चरित्र भेट दिले.सासरी येताना ते पुस्तक सोबत घेऊन त्या आल्या होत्या.यावरूनच त्यांची शिक्षणाविषयीची जिज्ञासा लक्षात येते पुढे जोतिरावांनी सावित्रीबाईंना रीतसर शिक्षण दिले.

         


             1जानेवारी 1848 रोजी     पुण्यातील भिडे वाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली.सुरवातीला या शाळेत फक्त सहा मुली होत्या. त्यात -

1) अन्नपूर्णा जोशी

2)सुमती मोकाशी 

3) माधवी थत्ते

4) सोनू पवार

5) दुर्गा भागवत

6) जनी कार्डीले यांचा समावेश होता.  वर्षभरात या संख्येत वाढ होऊन 40 ते 50 मुली शिक्षण घेऊ लागल्या. सावित्रीबाईंचे शिक्षण कार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने ब्रिटन अधिकारी मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्कार करून या दांपत्याला शैक्षणिक कार्यात प्रोत्साहित केले व शाळांना सरकारी अनुदान चालू केले.

             सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली, तेव्हा त्यांनी या शाळेत फक्त माळ्याच्याच  मुलींना प्रवेश दिला का? तर अजिबात नाही, त्यात इतर जाती-धर्माच्या (चार ब्राह्मण, एक मराठा, एक धनगर )मुली होत्या.याचे कारण म्हणजे त्या वेळी सर्वच जाती-धर्मातील स्त्रिया या एकूणच गुलाम होत्या.चूल आणि मूल एवढंच त्यांच्या नशिबी होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या मनात कुठलीच भेदभावाची भावना नव्हती. त्यांच्या डोक्यात फक्त मुलींना शिक्षण देणे एवढेच होते.

             नेपोलियनने फार सुंदर वाक्य म्हटलं होतं, " स्त्री शिकली तरच कुटुंब आणि राष्ट्र प्रगत होईल" हे जोतिबा आणि सावित्रीबाईनी जाणलं होतं आणि म्हणूनच सर्व जातीधर्मातील एकूण गुलाम असणाऱ्या  स्त्रियांना सावित्रीबाईंनी शिक्षण रुपी अमृत पाजून अज्ञान आणि अंधकाराच्या साखळदंडातुन बाहेर काढण्याचे पवित्र कार्य हाती घेतले.अशा या महान थोर मातेला कोटी कोटी प्रणाम.या ज्ञानज्योती  थोर आईचे कर्तृत्व आणि तिचा संघर्ष प्रत्येक भारतीय स्त्रीने लक्षात ठेवला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी ही दूरदृष्टी ठेवून जर शिक्षणाचे कार्य हाती घेतले नसते, तर आजच्या स्त्रीमध्ये एवढी प्रगल्भता येण्यासाठी कित्येक शतके वाट पाहावी लागली असती,हे ही आपल्याला विसरून चालणार नाही.

             आजही आपण वटसावित्रीची सावित्री लक्षात ठेवतो. पण ज्ञानज्योती सावित्रीबाईंनी लाखो स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून उच्च पदावर पोहोचवले. या सावित्री ची जयंती आपल्या लक्षात राहत नाही. आज आपल्याला वटसावित्रीची नाही तर शिक्षणाची सावित्री लक्षात ठेवण्याची गरज आहे.कारण सावित्रीबाईंनी ज्या शाळा सुरू केल्या त्यांचा वारसा पुढे चालवत आज स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत. पुराणातल्या सावित्रीने फक्त आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. पण या क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी अठराव्या शतकात मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली करून अज्ञान आणि अंधारातील स्त्रियांना बाहेर काढले. सावित्रीबाईनी त्या काळात जर शिक्षणाचे पवित्र कार्य हाती घेतले नसते,तर आजही आपल्या देशात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रियांना शिक्षण द्यावे का नाही ? या विषयावरच चर्चा झाली असती.

               शैक्षणिक कार्याबरोबरच इतर सामाजिक कार्यातही  त्या अग्रेसर होत्या.  सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्योतीबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले.1876 -77 साली  पडलेल्या दुष्काळात त्यांनी मोलाचे समाजकार्य केले.1897 साली पुणे येथे प्लेग या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली होती.त्या रोग्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी पुण्याजवळील ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला.आणि प्लेगच्या रोग्यांची सेवा करू लागल्या.हे करत असताना त्या स्वतःच  प्लेगच्या बळी ठरल्या.आणि 10 मार्च 1897 ला पुण्यात शेवटचा श्वास घेतला.  सावित्रीबाईंचे "काव्यफुले" आणि "बावनकशी सुबोध रत्नाकर" हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

              अशा या थोर मातेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन "बालिका दिन "म्हणून साजरा केला जातो.  शिकून भारतातील स्त्रियांना शिक्षित करणाऱ्या सावित्रीबाईंना सलाम.  सावित्रीबाईंचे हे योगदान सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या कार्यास आजच्या दिनी भारतीय स्त्रियांचा मानाचा मुजरा......मानाचा मुजरा....

      सहशिक्षिका

नंदा सोनकांबळे

जि. प. प्रा. शा. मुत्तलगाव

ता. उदगीर जि. लातूर 

            

1 comment:

टीईटी परीक्षा संदर्भाने

           " गुरुविन न मिळे ज्ञान,             ज्ञानाशिवाय न मिळे जगी सन्मान " " जे मुलांना शिकवतात ते शिक्षक असतात  जे मुलां...