Monday, January 18, 2021

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अहवाल लेखन






 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर,वर्धा व बुलढाणा,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तसेच मा. ना. प्रा.वर्षाताई गायकवाड मा. मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने" नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020" दिनांक 18 जानेवारी ते 22 जानेवारी 2021 पाच दिवशीय वेबिनार सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे.आज दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी या वेबिनार ची सुरुवात लातूर डाएटच्या  डॉ. भागीरथी गिरी मॅडम यांच्या प्रास्ताविकेने झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याचा उद्देश सांगताना त्या म्हणाल्या की ज्या ज्या नवीन गोष्टी शासनाकडून येतात त्या आम्हाला हव्या असतात. भारत हा विकसनशील देश आहे. त्याला सुपर पावर जर बनवायचा असेल तर एक ऐतिहासिक निर्णय या धोरणात मांडलेला आहे आणि शिक्षण प्रक्रियेत एक नवी दिशा यातून मिळणार आहे. एकविसाव्या शतकातील हे पहिल धोरण जरी असले तरी यापूर्वी 1968,1986,1992 आणि यात सुधारणा करून 2020 च नवीन शैक्षणिक धोरण तयार केलं आहे.  एकविसाव्या शतकातील यात कोणता बदल केलेला आहे याची माहिती या पाच दिवसीय वेबिनार मध्ये आपल्याला मिळणार आहे.  " राष्ट्रातील भवितव्य शाळेच्या वर्गा वर्गातून घडत आहे" कोठारी आयोगातील या वाक्याची त्यांनी आठवण करून दिली.  त्याच बरोबर "नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला केंद्रस्थानी मानून अशा शिक्षण प्रणालीची कल्पना करते की, ती सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय व चैतन्यमय समाजात परावर्तित करण्यात योगदान देते" म्हणजेच आपला भारत देश विकसनशील देश बनवायचा असेल तर मी माझ्या मुलांना कशा पद्धतीने घडवणार आहे याची माहिती, या पाच दिवसीय वेबिनार मध्ये आपण शिकणार आहोत.  हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. यानंतर बुलढाणा डायट चे प्रिन्सिपल विजय कुमार शिंदे सर व वर्धा डायटचे  प्रिन्सिपल डॉ. मंगेश घोगरे सर  यांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयी प्रास्ताविक मांडले.

                 आजच्या वेबिनार च्या मुख्य मार्गदर्शिका डॉ.नेहा बेलसरे मॅडम(MIEPA) यांचा एक आगळा वेगळा परिचय डॉ.भागीरथी गिरी मॅडमनी करून दिला. त्या म्हणाल्या की एखाद्या व्यक्तीचा परिचय काय द्यावा म्हणण्यापेक्षा किती द्यावा अशा या नेहा बेलसरे मॅडम आपल्या महाराष्ट्राच्या भूषण आहेत.

                 नवीन शैक्षणिक धोरण 2020 याविषयी बोलताना डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम म्हणाल्या की, " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 "हे प्रभावीपणे राबवून प्रत्येक घटकापर्यंत प्रभावी माध्यमातून पोचवले तर येत्या वीस वर्षात भारतातील शिक्षण पद्धती मुळातून बदलेल आणि भारत एक जागतिक ज्ञानसत्ता होईल. हे साध्य होण्यासाठी सर्वांनी हातभार लावून त्यात सक्रीय सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी प्रत्येक मानवी घटका समोर ठेवलं आहे.  हे करत असताना प्रत्येक मानवी घटकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समजून घेणे आणि त्याची मांडणी करणं गरजेचं आहे.हे धोरण निर्मिती करण्यामध्ये याचे अध्यक्ष हिसरोचे के. कस्तुरीरंगन आणि त्यांची अकरा जणांची टीम यांनी येत्या वीस वर्षात भारत कसा असला पाहिजे आणि कसा दिसला पाहिजे हा भविष्यवेधी दृष्टिकोन ठेवून हे धोरण त्यांनी विकसन  केले आहे.  समाजातील सर्व समस्या शिक्षणाने शोधण्याचे कार्य आणि या धो रणातील शिक्षण प्रक्रिया हे भारतीय मूल्यावर आधारीत असेल आणि येणारी पिढी सक्षम होईल.नवीन शैक्षणिक धोरण हे अतिशय प्रागतिक, व्यापक आणि भविष्यवेधी आहे यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्याचा विचार केलेला आहे.  सद्यस्थितीत शिक्षणात काही समस्या वर त्यांनी चर्चा केली यात घोकंपट्टीवर भर, गुण म्हणजे गुणवत्ता हा गैरसमज हे कुठेतरी बदलला  पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पाच मूलभूत स्तंभावर आधारित असून त्यात -

1) प्रवेश

2) समता

3) गुणवत्ता

4) परवडणारे

5) उत्तरदायित्व या पाच महत्त्वाच्या मुद्यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यानंतर प्रचलित शैक्षणिक रचना आणि नवीन शैक्षणिक रचना व यातील स्तर  यावरही चर्चा केली. 64 कला आणि 14 विद्या याचाही उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे  नाव बदलून" शिक्षण मंत्रालय" ठेवणे बाबतचा निर्णय ही त्यांनी सांगितला.  ज्ञान भाषा व माध्यम भाषा यावर ही सखोल मार्गदर्शन केले. पाचवीपर्यंत मातृभाषा हेच माध्यम असावं, आणि सहावीपासून व्यावसायिक व कृती शिक्षण रोजगारावर भर,कला-क्रीडा,योग शिक्षण द्यावे.  नववी ते बारावी या चार वर्षात 40 विषयाचा अभ्यास करण्याची संधी या धोरणाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.यामध्ये 24 विषयाची परीक्षा सत्र पद्धतीने होईल आणि 16 विषयाचे मूल्यांकन शाळास्तरावर होणार आहे असे त्यांनी सांगितले. (Nios) आणि राज्यातील मुक्त शाळा द्वारे तिसऱ्या, पाचव्या आठव्या इयत्ता साठी खुले शिक्षण आणि प्रज्ञावंताचे  शिक्षण यावरही त्यांनी विचार व्यक्त केले. प्रत्येक बालका पर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोचवणे हा शाळा समूहाचा मूळ उद्देश ही  त्यांनी सांगितला. तंत्रज्ञान व ऑनलाइन शिक्षण 2020 नवीन शैक्षणिक धोरण आले आणि आता 2040 पर्यंत जगामध्ये कुठलीही शिक्षण पद्धतीही भारत देशा पेक्षा पुढचे असणार नाही त्याच बरोबर आपण जागतिकीकरणा कडे जाताना भारतीय मूल्यं, संस्कृती इत्यादी सोबत घेऊन  शिक्षण देणार आहोत त्याच बरोबर पुस्तकाच्या उपलब्धतेबाबत तसेच डिजिटल ग्रंथालय आणि संस्थांचे धोरण  यावरही त्यांनी चर्चा केली.

              अभ्यासक्रम कमी करणे म्हणजेच कौशल्य आधारितशिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि घोकंपट्टी आधारित शिक्षण कमी करण्यासाठी सन 2020 पर्यंत अभ्यासक्रमात व अध्यापन शास्त्रात बदल करणे तसेच शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा( NcF)व शिक्षक प्रशिक्षणाबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सन 2021 पर्यंत तयार करणे, या धोरणातून आपण आत्मनिर्भर शिक्षणाचे स्वप्न बघत आहोत असेही त्या म्हणाल्या. केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकसित करण्यावर भर म्हणजेच मूल्यांकन पद्धतीत बदल आणि अध्ययन निष्पत्ती च्या आधारित मुलांचे शिकणे तपासले जाणार आहे. केवळ गुण न नोंदवता क्षमता, कौशल्य विकास,प्रगती पुस्तक,  स्थिती  नोंदवून सर्वांगीण विकासाला चालना दिली जावी. म्हणजेच वैविध्यपूर्ण पद्धती ने मूल्यांकन केले जाणार आहे.

                नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र विषयी बोलत असताना त्यांनी

1) अनुभवात्मक अध्ययन

2) एकात्मिक अध्यापन शास्त्र

3) समवयस्क कातिल अभ्यासास प्रोत्साहन

4) समान महत्त्व

5) दप्तर मुक्त दिन

6) तंत्रज्ञानाचा वापर या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली यानंतर शालेय शिक्षणासाठी मानक निश्चिती आणि अधिस्वीकृती त्याचबरोबर इंटिग्रेटेड पदवी यावरही सखोल मार्गदर्शन केले.

                सन 2030 पर्यंत शिक्षक शिक्षणाचे बदल हळूहळू बहू विद्या शाखीय,महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये केले जाईल. यात शिक्षक शिक्षण सुधारणा करणे, शिक्षक भरती आणि नेमणूक,  सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांवर(SEDGS) विशेष लक्ष, इत्यादी विषयाचे नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणातील बदल लक्षात आणून दिले.  आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील अंमलबजावणीसाठी कालरेषा यातील प्रत्येक बाबींची मुद्देसूद चर्चा केली.

                यानंतर डॉ.भागीरथी  गिरी मॅडम आणि लातूर डायट चे प्राचार्य डॉ. अनिल मुरकुटे सर यांनी या वेबिनार चे आभार व्यक्त करत असताना मोलाचे मार्गदर्शन केले. खरोखरच महाराष्ट्राच्या भूषण असलेल्या डॉ. नेहा बेलसरे मॅडम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून आम्हाला प्रेरित केले आहे.त्याबद्दल डॉ.नेहा बेलसरे मॅडम आणि लातूर, वर्धा आणि बुलढाणा टीम यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक विशेष अभिनंदन आणि आभार.

      अहवाल लेखन

 सहशिक्षिका

 श्रीमती नंदा सोनकांबळे

 जि प प्रा शा मुत्तलगाव

ता. उदगीर जि. लातूर 

Friday, January 1, 2021

सावित्रीबाई फुले - स्त्री शिक्षणाच्या जनक



जगाच्या इतिहासात न मिळणारे स्त्री व्यक्तिमत्व, समाज व्यवस्थेच्या विरुद्ध प्रवाहाने शैक्षणिक कार्य करून जगाच्या इतिहासात स्त्रियांना स्थान मिळवून देणारी थोर माता, स्त्री शिक्षणाच्या प्रथम प्रणेत्या, स्त्री शिक्षणाच्या जनक,भारतातील पहिल्या शिक्षक,मुख्याध्यापिका,महिला समाजसुधारक, मराठीतील पहिल्या कवयित्री, पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत म्हणजेच विश्वभुषण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.

          अज्ञान आणि अंधकाराने ग्रासलेल्या समाजात एक मशाल बनून  3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी जन्म घेते. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी 1840 साली झाले. त्यावेळी ज्योतिबा तेरा वर्षांचे होते.

           लहानपणी सावित्रीबाई शिरवळच्या  बाजारात जिलेबी खात उभ्या होत्या,तेव्हा कोणीतरी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना ख्रिश्चन चरित्र भेट दिले.सासरी येताना ते पुस्तक सोबत घेऊन त्या आल्या होत्या.यावरूनच त्यांची शिक्षणाविषयीची जिज्ञासा लक्षात येते पुढे जोतिरावांनी सावित्रीबाईंना रीतसर शिक्षण दिले.

         


             1जानेवारी 1848 रोजी     पुण्यातील भिडे वाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली.सुरवातीला या शाळेत फक्त सहा मुली होत्या. त्यात -

1) अन्नपूर्णा जोशी

2)सुमती मोकाशी 

3) माधवी थत्ते

4) सोनू पवार

5) दुर्गा भागवत

6) जनी कार्डीले यांचा समावेश होता.  वर्षभरात या संख्येत वाढ होऊन 40 ते 50 मुली शिक्षण घेऊ लागल्या. सावित्रीबाईंचे शिक्षण कार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने ब्रिटन अधिकारी मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्कार करून या दांपत्याला शैक्षणिक कार्यात प्रोत्साहित केले व शाळांना सरकारी अनुदान चालू केले.

             सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली, तेव्हा त्यांनी या शाळेत फक्त माळ्याच्याच  मुलींना प्रवेश दिला का? तर अजिबात नाही, त्यात इतर जाती-धर्माच्या (चार ब्राह्मण, एक मराठा, एक धनगर )मुली होत्या.याचे कारण म्हणजे त्या वेळी सर्वच जाती-धर्मातील स्त्रिया या एकूणच गुलाम होत्या.चूल आणि मूल एवढंच त्यांच्या नशिबी होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या मनात कुठलीच भेदभावाची भावना नव्हती. त्यांच्या डोक्यात फक्त मुलींना शिक्षण देणे एवढेच होते.

             नेपोलियनने फार सुंदर वाक्य म्हटलं होतं, " स्त्री शिकली तरच कुटुंब आणि राष्ट्र प्रगत होईल" हे जोतिबा आणि सावित्रीबाईनी जाणलं होतं आणि म्हणूनच सर्व जातीधर्मातील एकूण गुलाम असणाऱ्या  स्त्रियांना सावित्रीबाईंनी शिक्षण रुपी अमृत पाजून अज्ञान आणि अंधकाराच्या साखळदंडातुन बाहेर काढण्याचे पवित्र कार्य हाती घेतले.अशा या महान थोर मातेला कोटी कोटी प्रणाम.या ज्ञानज्योती  थोर आईचे कर्तृत्व आणि तिचा संघर्ष प्रत्येक भारतीय स्त्रीने लक्षात ठेवला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी ही दूरदृष्टी ठेवून जर शिक्षणाचे कार्य हाती घेतले नसते, तर आजच्या स्त्रीमध्ये एवढी प्रगल्भता येण्यासाठी कित्येक शतके वाट पाहावी लागली असती,हे ही आपल्याला विसरून चालणार नाही.

             आजही आपण वटसावित्रीची सावित्री लक्षात ठेवतो. पण ज्ञानज्योती सावित्रीबाईंनी लाखो स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून उच्च पदावर पोहोचवले. या सावित्री ची जयंती आपल्या लक्षात राहत नाही. आज आपल्याला वटसावित्रीची नाही तर शिक्षणाची सावित्री लक्षात ठेवण्याची गरज आहे.कारण सावित्रीबाईंनी ज्या शाळा सुरू केल्या त्यांचा वारसा पुढे चालवत आज स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत. पुराणातल्या सावित्रीने फक्त आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. पण या क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी अठराव्या शतकात मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली करून अज्ञान आणि अंधारातील स्त्रियांना बाहेर काढले. सावित्रीबाईनी त्या काळात जर शिक्षणाचे पवित्र कार्य हाती घेतले नसते,तर आजही आपल्या देशात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रियांना शिक्षण द्यावे का नाही ? या विषयावरच चर्चा झाली असती.

               शैक्षणिक कार्याबरोबरच इतर सामाजिक कार्यातही  त्या अग्रेसर होत्या.  सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्योतीबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले.1876 -77 साली  पडलेल्या दुष्काळात त्यांनी मोलाचे समाजकार्य केले.1897 साली पुणे येथे प्लेग या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली होती.त्या रोग्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी पुण्याजवळील ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला.आणि प्लेगच्या रोग्यांची सेवा करू लागल्या.हे करत असताना त्या स्वतःच  प्लेगच्या बळी ठरल्या.आणि 10 मार्च 1897 ला पुण्यात शेवटचा श्वास घेतला.  सावित्रीबाईंचे "काव्यफुले" आणि "बावनकशी सुबोध रत्नाकर" हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

              अशा या थोर मातेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन "बालिका दिन "म्हणून साजरा केला जातो.  शिकून भारतातील स्त्रियांना शिक्षित करणाऱ्या सावित्रीबाईंना सलाम.  सावित्रीबाईंचे हे योगदान सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या कार्यास आजच्या दिनी भारतीय स्त्रियांचा मानाचा मुजरा......मानाचा मुजरा....

      सहशिक्षिका

नंदा सोनकांबळे

जि. प. प्रा. शा. मुत्तलगाव

ता. उदगीर जि. लातूर 

            

टीईटी परीक्षा संदर्भाने

           " गुरुविन न मिळे ज्ञान,             ज्ञानाशिवाय न मिळे जगी सन्मान " " जे मुलांना शिकवतात ते शिक्षक असतात  जे मुलां...