" गुरुविन न मिळे ज्ञान,
ज्ञानाशिवाय न मिळे जगी सन्मान "
" जे मुलांना शिकवतात ते शिक्षक असतात
जे मुलांना घडवतात ते शिक्षक असतात
जे मुलांचे भविष्य सावरतात ते शिक्षक असतात
जे पंखात बळ देतात ते शिक्षक असतात "
शिक्षक बांधवांनो,
नोकरी काही आपल्याला वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी नाही. तर अति कठीण परिस्थितीमध्ये दिवस-रात्र एक करून मिळवलेली पात्रता आहे. आपण पात्र आहोत म्हणून आपल्याला नोकरी दिलेली आहे. पुन्हा नव्याने यांची टीईटी परीक्षा देऊन पात्रता दाखवण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा मला कुसुमाग्रजांची " फक्त लढ म्हणा " ही कविता आठवते. जे की जगायला, जिंकायला आणि पडल्यानंतरही पुन्हा उभा राहायला शिकवते. त्याप्रमाणेच पाच डिसेंबर रोजी चा मोर्चा आपल्याला जोपर्यंत आपण जिंकत नाहीत तोपर्यंत एकजुटीने पुढे घेऊन जायचा आहे.
" शिक्षकांशिवाय शिक्षणाची क्रांती घडू शकत नाही. त्यांना माहित पाहिजे की, आपण क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे आदर्श शिक्षक आहोत. तेव्हाच्या कठीण परिस्थितीमध्ये फुले दाम्पत्यांनी हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाची एवढी मोठी क्रांती घडवली. त्यावेळी ते दोघे होते पण आता आपण असंख्य आहोत. त्याकाळी फुले दांपत्याने फक्त शिकवण्याचे काम केले म्हणून शिक्षणाची एवढी मोठी क्रांती घडून आली पण आत्ताचे सत्ताधारी आपल्याला इतर अनेक कामांमध्ये गुंतवून ठेवून, ऑनलाइन ची कामे, अशैक्षणिक कामे, अनावश्यक उपक्रमांचा बोजा शिक्षकावर लादून त्यांना शिकवण्यासाठी वेळ अपुरा पाडतोय. आमची एकच मागणी आहे, " आम्हाला फक्त शिकवू द्या, मुलांमध्ये विविध मूल्ये रुजवण्यासाठी वेळ द्या आणि जर असे झाले तर आपण सर्वजण भारत महासत्ता होण्याचे जे स्वप्न पाहतोय ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही ".
पूर्वी शाळेत चौथी किंवा सातवी पास असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायला होते. त्यांनी नाही का देशाला राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, डॉक्टर, इंजिनीयर, वकील असे विविध क्षेत्रात कार्य करणारे विद्यार्थी देशाला दिले आणि आता तर आम्ही पात्र असलेले शिक्षक आहोत, आमचे विद्यार्थी तर विदेशात जाऊन विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. पण जे आमच्याकडे बोट दाखवत आहेत, आमच्या पगारावर बोलत आहेत त्यांना कळाले पाहिजे की आम्ही शिक्षक त्यांच्यासारखे वारसा हक्काने खुर्चीवर बसलेलो नाहीत, तर पात्रता असल्यामुळे शासनाने आमची नेमणूक केली आहे. आता टीईटी परीक्षा आमच्यावर लादून नव्याने पुन्हा आमची पात्रता बघण्याचा कुणालाही हक्क नाही. म्हणून म्हणते आम्हाला आमचं काम करू द्या.
" आम्हाला फक्त शिकवू द्या,
आम्हाला फक्त शिकवू द्या".
श्रीमती नंदा निवृत्ती सोनकांबळे
जि. प. प्रा. शा. काशीराम तांडा
ता. उदगीर जि. लातूर मो. नं 7038219211
